पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलण्याची मागणी फेटाळली   

चंडीगढ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारुन २६ पर्यटकांची हत्या करण्यात आली. या संदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात मंगळवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जात ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांची निर्घृण हत्या केली, त्या ठिकाणाला ’शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ’ असे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती, तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या व्यक्तींना शहीदांचा दर्जा मिळावा, अशीही विनंतीही करण्यात आली होती. मात्र, हा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.  
 
मुख्य न्यायाधीश शील नागू आणि न्यायमूर्ती सुमित गोयल यांच्या खंडपीठाने हा अर्ज फेटाळत स्पष्टपणे सांगितले, की अशा प्रकारचे निर्णय म्हणजे एखाद्या ठिकाणाचे नाव बदलणे किंवा मृत व्यक्तींना शहीद घोषित करणे, हे पूर्णपणे सरकारच्या कार्यक्षेत्रात येते. न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.
 
खंडपीठाने नमूद केले, की स्मारक उभारणे, जागा जाहीर करणे किंवा तिचे नामकरण करणे हे सरकारचे काम आहे. याशिवाय, एखाद्या व्यक्तीस शहीद घोषित करणे देखील प्रशासनाचा निर्णय असतो. न्यायालय धोरण ठरवू शकत नाही, हे काम संसद किंवा संबंधित विधिमंडळाचे आहे.
 
न्यायालयाने अर्जकर्त्याला सल्ला दिला, की तो या संदर्भात सरकारकडे अधिकृत निवेदन देऊ शकतो. सरकार त्याचा विचार कायदेशीर चौकटीत करून निर्णय घेऊ शकते. न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर असलेल्या या विषयात न्यायालयाने स्वतःला दूर ठेवले.
 

Related Articles